अंधश्रद्धांतून मुक्ती बहुतांश लोक कोणत्या ना कोणत्या चुकीच्या समजुतीला बळी पडतात. काही जण; मांजर आडवं गेलं तर अपशकून घडतो यावर विश्वास ठेवतात, तर काही; ईश्वर नाराज होतो असं मानतात. पाल अंगावर पडणं हे एखाद्यासाठी अशुभ असतं; तर कोणाला झाडू उलटा ठेवणं मान्य नसतं. इतकंच काय पण काळ्या रंगाचे कपडे हा कोणासाठी अशुभ संकेत असतो. शिवाय संध्याकाळी केरकचरा काढायचा नाही, घर झाडायचं नाही असं मानणारे काही लोक आजही आहेत. आज 21व्या शतकातही बऱ्याच जणांच्या मनावर विविध अंधश्रद्धांचं, रूढी-परंपरांचं गारुड कायम असतं. "तळहाताला खाज सुटली तर धनलाभ होणार... तीन तिगाडा काम बिगाडा... लकी ड्रेस, लकी नंबर... अमुक देवाची आराधना केल्यावर धनलाभ, सुखप्राप्ती... ' अंधश्रद्धांची ही लिस्ट काही केल्या संपत नाही. मात्र यांमुळे मनुष्याचा आत्मविश्वास, सत्यनिष्ठा आणि आत्मश्रद्धा यांना तडा जातो. प्रस्तुत पुस्तक म्हणजे तुमच्या मनातल्या सर्व चुकीच्या समजुतींना छेद देणारा, रूढी-परंपरांमागचं विज्ञान समजून सांगणारा आणि विश्वासाच्या, श्रद्धेच्या शिखरावर पोहोचण्यासाठी मार्ग दाखवणारा जणू दीपस्तंभच!